मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार अन् गिरीश महाजनांमध्ये झाली खडाजंगी; कारण काय?

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या दोन दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धामुळे कॅबिनेटमधील अन्य सदस्यही अचंबित झाले.

या कारणावरून झाली खडाजंगी?
खरंतर काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी गिरीश महाजन यांनी ग्रामविकास विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी अजित पवारांकडे केली. मात्र यानंतर पैसे कोठून आणू…आता काय जमिनी विकायच्या का? अशा शब्दांत अजित पवार यांनी महाजन यांना सुनावले

त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. आपल्या गटाचे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघातील एका स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळात मांडला होता. हा धागा पकडत ‘नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला?’ असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.