सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर अजित पवारांच्या गौप्यस्पोटामुळे काँग्रेसची गोची

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या खेळीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे बोलले जात असले तरी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्पोटामुळे काँग्रेसची मोठी गोची झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असे अजित पवार म्हणाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला होता. या जागेवर काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज दाखल करावयाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा ए बी फॉर्म असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. या जागेवर सत्यजित तांबे यांचा विजय झाला तरी ते अपक्षच आमदार असतील. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीआधीच ही जागा गमावली आहे. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. परिणामी काँग्रेस तसेच बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

याच मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असे अजित पवार म्हणाले आहेत. दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपाने मला पाठिंबा द्यावा, अशी माझी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास आम्ही विचार करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं कोणतं राजकीय समीकरण पाहायला मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.