अमळनेर हादरलं! दोन तरुणांना आयुष्यातून उठवलं, काय कारण?

अमळनेर : शहरासह सावखेडा येथील दोन तरुणांचा विविध कारणावरून झालेल्या वादातून खून झाला. अक्षय राजू भील (वय २१, रा. अमळनेर),  नाना मंगलसिंग बारेला (वय २१, रा. सावखेडा) असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही धक्कादायक घटना सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री घडली.

शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (21) या तरुणावर सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली.

दुसरी घटना तालुक्यातील सावखेडा येथील वैदूवाड्यात सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. नाना मंगलसिंग बारेला (21) या तरुणाला वैयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (22) याने कुर्‍हाडीने वार करून संपवले.

अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, हवालदार सुनील जाधव, राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले.  या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.