अमित शाहांचे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आदेश; वाचा काय म्हणाले…

नवी दिल्ली : भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची दखल खुद्द केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण होवून त्याचा फटका भाजपाला बसू शकतो, याची जाणीव दिल्लीच्या श्रेष्ठींना असल्याने अमित शाह यांनी कोणी व कसे बोलावे, याबाबतच्या सुचना राज्यातील भाजप नेत्यांना दिल्या आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वादग्रस्त विधान न करण्याचे आदेशच दिले आहेत.

भाजपचे आमदार आशिष शेलार काल दिल्लीत होते. शेलार यांनी काल अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील राजकीय समीकरणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावरही या नेत्यांसोबत शेलार यांनी चर्चा केली. त्यावेळी अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नये. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ते योग्य नाही. याला आवर घाला. केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे. दोन्ही सरकारच्या विकासकामांवरच बोला, अशी ताकीदच शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पाटील काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत बाबरी आंदोलनातील शिवसेनेचं योगदान नाकारलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं बाबरी आंदोलनात योगदान नाही. शिवसेनेचा नेता बाबरी पडताना तिथे नव्हता, असं सांगतानाच बाबरी आंदोलनाचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच दिलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.