अजित पवारांनी टिका केल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले…

मुंबई : शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अजित पवारांनी टीका केल्यानंतर त्यावर अमोल कोल्हे यांनी देखील भाष्य केले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार
एका खासदाराने माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. आता “निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यामुळे पदयात्रा सुरु आहेत. कुणाला संघर्षयात्रा सुचते तर कुणाला पदयात्रा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सहा तालुक्यांमध्ये सांगतो कशी यांची भूमिका होती आणि गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपल्या मतदारसंघात पाहिलं आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच तू ढेपाळला आणि तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो. आता तिथे दिलेला उमेदवार निवडणूनच आणणार आहे,” असा इशारा अजित पवार यांनी दिला.

काय म्हणाले अमोल कोल्हे
“अजित पवार हे खूप मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी सर्वसामान्य कार्यकर्त्याने बोलणं उचित ठरणार नाही. “खासगीतल्या गोष्टींना काही संकेत असतात. मग त्यांची कारणमीमांसासुद्धा लोकांना सांगावी लागेल. इतक्या मोठ्या नेत्यासोबत खासगीत केलेल्या गोष्टी लोकांमध्ये सांगायला लागलो तर ते संकेतांना धरुन होणार नाही. त्यामुळे अजित पवारांविषयी मी भाष्य करणार नाही. परिस्थिती बदलली म्हणून खोटे बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली हे खरेच आहे. अजितदादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.