भीषण अपघात; अमरावतीत 25 प्रवाशांची बस दरीत कोसळली

अमरावती: अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्य प्रदेशाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. घाट वळणावर असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस ३० फूट खोल दरीत कोसळली. बसमधील २५ पेक्षा अधिक प्रवासी अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशच्या तुकईथडला जाणाऱ्या परतवाडा आगाराच्या बसला सकाळी साडे अकराच्या सुमारास अपघात झाला. जवाहर कुंड येथे घाट वळणावर असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

इंदू समाधान गंत्रे (६५) आणि ललिता चिमोटे (३०) अशी अपघातात दगावलेल्या महिलांची नावं आहेत. आरोग्य यंत्रणेकडून जखमींना रुग्णवाहिकेतून तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. चिखलदरा पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. परिवहन महामंडळाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत.