अन्‌‍ राधाकृष्ण विखे पाटलांवर कार्यकर्त्यांनी उधळला भंडारा….

सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या (Dhangar Reservation Action Committee) कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा (Bhandara) टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर येथे शासकिय विश्रामगृहात हा प्रकार घडला. अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने धनगर समाजातील बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

https://youtu.be/b3tRI041zq8

यावरून आता धनगर आरक्षणाचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे.

नेमकं घडलं काय?

राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याची माहिती त्यांना कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं. शंकर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी आला. आपल्याला विखे-पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी शंकर बंगाळे याला विखे-पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शंकर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे-पाटील हे निवेदन वाचत असताना शंकर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिता केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या. यावेळी विखे-पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.

हा प्रकार बघताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी तातडीने शंकर बंगाळे याला पकडले. या सगळ्यांनी शंकर बंगाळे याला खाली पाडून थोडीफार मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शंकर बंगाळे याला ताब्यात घेतले. शंकर बंगाळे याने यापूर्वीही असाच प्रकार केला होता. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात शंकर बंगाळे याने सोलापूर येथील सभेत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शंकर बंगाळे यांनी अशीच कृती केली आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. मात्र, या घटनेमुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.