लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात, पाच जवान शहीद

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T-72 रणगाड्याचा दुर्दैवी अपघात झाला आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. शुक्रवारी युद्ध सुराव सुरु होता. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. सध्या या भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लडाखमधील दौलत बेग येथे मंदिर मोर येथे हा अपघात झाला आहे. लष्करातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारास आर्मीचा रणगाडा प्रशिक्षणासाठी बाहेर आणण्यात आला होता. प्रशिक्षणाचा भाग म्हणून रणगाडा पाण्यात उतरवण्यात आला. पण, अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रणगाड्यातील पाच जवानांचा मृत्यू झाला. पाचही जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही भारतासाठी महत्त्वाची आहे. १९६२ मधील भारत-चीन युद्ध आणि नुकतेच पीएलएसोबत झालेला संघर्ष या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला याठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. मात्र, या ठिकाणी गस्त घालणे तितकेच कठीण असते. जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते.