---Advertisement---
तळोदा प्रतिनिधी : बफर योजनेअंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पाडले व शेतकऱ्यांची लूट केली यावरून संतप्त झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आक्रोश करीत धरणे आंदोलन केले.
यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असता 6 हजार 800 मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचे उघड झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून डॉ. गावित यांनी आंदोलकांच्या वतीने हा घोटाळा करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि संबंधित तीन एजन्सीज ब्लॅक लिस्टमध्ये टाका, अशी मागणी केली.
अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नाही. मिळालाच तर तो चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहे. युरिया खत वाटपात कृषी सेवा केंद्रांनी केलेल्या मनमानीबाबत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, खताभावी शेतकऱ्यांच्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तसेच अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी.
बफर योजनेअंतर्गत युरिया खताची उपलब्धता असताना तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासाठी बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले होते.
---Advertisement---
आंदोलनाच्या ठिकाणी डॉ. हिना गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना फैलावर घेत, सगळे रेकॉर्ड दाखवायला भाग पाडले. हजारो मेट्रिक टन युरिया काळा बाजारात गायब होत असताना देखील संबंधित सर्व अधिकारी कसे निष्क्रिय राहिले हे सर्वांसमोर उघड झाले. या जनआक्रोश आंदोलनात बोलताना डॉ. हिना गावित यांनी युरिया खताच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांवर घणाघात केला.
उपस्थित ग्रामस्थांसमोर त्यांनी सांगितले की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताच्या पुरवठा झाला असताना देखील, तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित असल्याने, तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला आहे. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याचे दिसत आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषी कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी केली.
दरम्यान, सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या श्रीराम ऍग्रो एजन्सी, दीपभूषण फार्मर प्रोडूसर कंपनी, गणेश एजन्सीसह इतर खते विक्री केंद्रांची चौकशी करून, 11 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक चेतनकुमार ठाकरे यांच्या आदेशान्वये तालुका कृषी अधिकारी सुरज नामदास, व कृषी अधिकारी किशोर हडपे, कृषी निरीक्षक वसावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर, आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले
जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, नितेश वळवी, अक्कलकुवा मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी, मोलगी मंडळ अध्यक्ष तथा सरपंच आकाश वसावे, भूपेंद्र पाडवी, किसन नाईक, जयमल पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे, सुधीर पाडवी, किशोर वळवी, अशोक राऊत, अनिल पाडवी, जगदीश वसावे, किसन नाईक, बहादुरसिंग पाडवी, हरिदास गोसावी, रोशन पाडवी, नरेश पाडवी, दिलीप वसावे, मनोज सोनार, नरेश पाडवी, मनीषा राऊत, ईश्वर वसावे आदि उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, धनसिंग वसावे, नितेश वळवी, आकाश वसावे, सुधीर पाडवी आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अधिकाऱ्यांची मनमानी भाषणातून मांडली.