नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, आखतवाडे आणि लगतच्या गावांमध्ये (5 जून) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे घरांचे व शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डॉ. विजयकुमार गावित यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मदत मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या, तसेच ग्रामस्थांचे सांत्वनदेखील केले.
तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाच मोठा नुकसान झाले आहे. याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज ६ जून रोजी दुपारी चार च्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
यावेळी मांडळच्या मंडळ भागातील एकूण 122 घरांची पडझड झाली तसेच खर्दे खुर्द येथे वादळी पावसाच्या दरम्यान निलेश मन्साराम भिल नामक व्यक्तीचा मृत्यू झाला तर दिनेश बन्सीलाल भिल हा तरुण जखमी झाला आहे. खरदेखुर्द येथील अंगणवाडी चे सर्व पत्रे उडाले आहेत अशी माहिती देण्यात आली. पडलेली घरे, उडालेले पत्रे तसेच नुकसान झालेल्या वाहनांची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली. तसेच पावसामुळे शेती पिकाचा नुकसान झाला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली.
भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील , वैंदाणे गावचे सरपंच डॉ मनोज गिरासे , तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील , महावितरण चे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी , उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील , कृषी विभागाचे अधिकारी, तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. या सर्व पाहणीनंतर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या.