तळोदा : तब्बल दीड महिन्यानंतर उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (16 जून) शाळांची घंटा खणखणली. शाळांमध्ये जुन्या तसेच नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे आजी-माजी मंत्र्यांसह आमदार, खासदार, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील औट्रम घाटमाथ्याच्या पायथ्यानजीक मालेगाव रोडलगत असलेल्या देवळी आश्रमशाळेत मात्र नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मालमोटारीतून पशुधनाप्रमाणे कोंबून अक्कलकुवा (नंदुरबार) ते देवळी (ता. चाळीसगाव, जळगाव) येथे तब्बल 200 किलोमीटर धक्केयुक्त प्रवासाने करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील देवळी (ता. चाळीसगाव) येथील अनुदानित आश्रमशाळेतील काही शिक्षक हे आश्रमशाळेत प्रवेशित असलेले अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 70 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी देवळी येथून सहाचाकी मालमोटारीतून (एमएच 19, सीवाय 7697) अक्कलकुवा येथे आणले होते. या संस्थेने सहा ते आठ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता विद्यार्थ्यांना मालमोटारीत कोंबून बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पालक संतप्त झाले आहेत.
शिक्षिका, काळजीवाहकाविनाच मुलींचा प्रवास
विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस म्हणून या मालमोटारीला वरून ताडपत्री झाकली होती. यात तब्बल 70 विद्यार्थ्यांमध्ये 35 ते 40 विद्यार्थिनींचा समावेश असताना एकही महिला शिक्षिका वा काळजीवाहक सुरक्षा कर्मचारी नसताना दोनशे किलोमीटर प्रवास करण्यात आला. त्यामुळे शाळकरी लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता.
ना नाश्ता, ना जेवण… सात तासांचा प्रवास
अक्कलकुवा येथून देवळी या गावाचे अंतर सुमारे 200 किलोमीटरपेक्षा अधिक असतानाही संबंधित संस्थेने मुलांना बस, चारचाकी वाहन आदींतून न नेता चक्क मालमोटारीतून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दुपारी दोनपर्यंत संस्थेने मुलांना ना चहापान दिले, ना नाश्ता, ना जेवण, त्यामुळे मुलांचे चेहरे भुकेने व्याकूळ झाले होते.
बसमधून अवघ्या 27 विद्यार्थ्यांचा प्रवास
अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात या वाहनात मुलांना बसविताना काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारून मुलांना बसमध्ये नेण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकांनी होकार दिला, मात्र, बसमधून केवळ 27 मुलांना नेण्यात आल्याचे समजले. यासंदर्भात आगारप्रमुखांसोबत संपर्क साधल्यानंतर त्यांनी चाळीसगावकडे गेलेल्या दोन्ही बसच्या वाहकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून एका बसमधून केवळ 27 विद्यार्थ्यांनाच नेण्यात आल्याची माहिती दिली. उर्वरित मुले ही मालमोटारीतूनच नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
संस्थाचालक, शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करा
मुलांची सुरक्षितता आणि त्यांची काळजी न घेता बेजबाबदारपणे मालमोटारीतून मुलांना नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांसह संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वर्ष- दीड वर्षापूर्वीही चाळीसगाव परिसरातीलच एका आश्रमशाळेत खुद्द आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची तपासणी केली होती. त्या वेळी नित्कृष्ट प्रतीचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याची बाब उघडकीस आली होती.