हॉस्पिटलवर हल्ला 500 ठार, PM मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली : गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात एक रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. या एअर स्ट्राइकमध्ये एकाचवेळी 500 जणांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलवरील एअर स्ट्राइकमध्ये अनेक निरपराध, निष्पाप नागरिक मारले गेले. पॅलेस्टाइनमधील अनेकांनी सुरक्षित आश्रय स्थळ म्हणून या अल अहली रुग्णलयात आसरा घेतला होता. पण एअर स्ट्राइकमध्ये अनेक निरपराधांना प्राण गमवावे लागले. गाझातील आरोग्य यंत्रणेने या हवाई हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. मात्र इस्रायलयने मात्र हॉस्पिटलवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रतिक्रीया आली आहे.

“संपूर्ण जगाला माहित असलं पाहिजे, गाझामधील क्रूर दहशतवाद्यांनीच गाझातील हॉस्पिटलवर हल्ला केला. इस्रायली डिफेन्स फोर्सचा याच्याशी काही संबंध नाहीय, असं बेंजामिन नेतान्याहू यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. “शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट्स डागण्यात आले होते, ज्यातील एक रॉकेट दिशा भरकटून गाझाच्या रुग्णालयावर पडलं. आमच्याकडे गोपनीय माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार, रॉकेट हल्ल्यासाठी इस्लामिक जिहाद जबाबदार आहे” असं इस्रायलच म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर आता टि्वटकरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात. “अल अहली हॉस्पिटलच्या घटनेने आपल्याला धक्का बसलाय. पीडित कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा, वेगाने रिकव्हरी व्हावी यासाठी प्रार्थना. सध्या सुरु असलेल्या युद्धात निष्पाप नागरिकांचे प्राण जातायत ही गंभीर बाब आहे. अल अहली हॉस्पिटलच्या हल्ल्यामागे जे कोणी आहेत, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे” असं पंतप्रधान मोदींनी टि्वटमध्ये म्हटलय.