---Advertisement---
नंदुरबार : शासन एकीकडे स्मार्ट स्कूलचा गाजावाजा करीत असताना अक्कलकुवा तालुक्यातील बारी सुरगस जिल्हा परिषद शाळेची दैना पाहता, गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोसो दूरच आहेत. वर्षभरापासून शाळा पावसात कोसळली असून, तेव्हापासून शासन-शिक्षण खात्याच्या दुर्लक्षपणामुळे दुरुस्तीची एकही वीट रचलेली नाही. आता शिक्षकांनी पदरमोड करून उभारलेल्या ताडपत्रीरूपी खोलीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील बारी सुरगस या अतिदुर्गम आदिवासी गावातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा गेल्या वर्षी पावसात कोसळली. आज एक वर्ष उलटून गेले, तरीही शासनाच्या आणि शिक्षण खात्याच्या दुर्लक्षामुळे अद्याप दुरुस्तीची एकही वीट रचली गेलेली नाही. मुलांना गळक्या खोलीत किंवा शिक्षकांनी स्वतः च्या पैशाने उभारलेल्या ताडपत्रीखाली शिकावे लागतेय.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्गासाठी फक्त एकच खोली वापरण्यात येते. उर्वरित खोल्यांच्या छपरांतून पाऊस गळतो आणि त्या धोकादायक अवस्थेत आहेत. ही परिस्थिती केवळ शिक्षणाची नाही, तर शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा अपमान आहे.
‘स्मार्ट स्कूल’च्या घोषणा आणि जमिनीवर ताडपत्री !
राज्य शासन स्मार्ट स्कूल, डिजिटल शिक्षण, आधुनिक सुविधांचा गाजावाजा करते; पण वास्तवात आदिवासी भागात शाळेला छप्परही मिळू शकत नाही. ही स्थिती शासनाच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक आहे.