जळगाव : शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईचा लाभ घेणाऱ्यांनी खोटे पत्ते नमूद करून लाभ घेतला आहे. त्यांच्या पाल्याच्या आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे जोडण्यावरून आता पालकांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. पुण्यात अशा अठरा पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले असून शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात देखिल असे प्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागांतर्गत पालकांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलीय.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी इच्छुक मुलांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा अशा प्राधान्यक्रमानुसार ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्यास संबंधित मुलाचा प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
बालकांच्या शिक्षण प्रवेशासाठी बनावट निवासाची कागदपत्रे जोडली असल्याचा प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. आरटीई अंतर्गत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार पालकांनी पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी बनावट पत्ते दिले असून त्या पालकांचे बिंग फुटले आहे. त्यानंतर बनावट पत्ते दिलेल्या पालकांवर शिक्षण विभागाकडून खोटी माहिती दिल्याप्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चंद्रकांत भोसले, खंडू दिलीप बिरादार, रामकृष्ण तानाजी चोंधे, सुमित सुरेश इंगवले, विजय सुभाष जोजारे, मंगेश गुलाब काळभोर, रोहिदास मारुती कोंढाळकर, श्रीधर बाबुराव नागुरे, बाबासाहेब छबुराव रंधे, विलास रामदास साळुंखे, गणेश राजाराम सांगळे, रुपेश बाळकृष्ण सावंत, दिगंबर पंडित सावंत, चंदन अंकुश शेलार, कुंभराम सांगिलाल सुतार, मंगेश झगुलाल गुरव, विवेक जयवंत जोरी, उमेश हिरामण शेडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.
पालकांकडून झाली फसवणूक
आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला होता. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील काही बड्या खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत सुमारे 950 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये 18 पालकांनी त्यांच्या पाल्यांचा खोटा रहिवासी पुरावा सादर करून 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतल्याचे समोर आले असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात देखिल असे प्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागांतर्गत पालकांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पालकांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करण्यात येत असून असे आढळल्यास संबंधीत पालकांवर गुन्हे दाखल करण्यासह त्यांच्या पाल्यांना शाळा प्रवेश देण्यात येवू नयेत अशा सूचना शिक्षण विभाग पुणे यांनी दिलेल्या असल्याचेही जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने म्हटले.