शिंदे सरकारचा मोठा निर्णय… १ मे पासून मंत्रालयाचा कारभार होणार पेपरलेस !

तरुण भारत लाईव्ह न्युज : शिंदे सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये एका नवीन निर्णयाची घोषणा केली होती. ती म्हणजे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी व मंत्रालयाचा कारभार पेपरलेस व्हावा . आणि हीच घोषणा १ मे २०२३ पासून आमलात आणली जात आहे. मंत्रालयातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याच्या विविध भागातून  नागरिक प्रवास करून कामाच्या पाठपुराव्यासाठी  मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येतात. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तक्रार-विनंती-माहिती पत्र देण्याच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक मंत्रालयात फेरफटका मारतात. यामुळे मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर वाढती गर्दी लक्षात घेता , तसेच दैनंदिन कामात येणारा अडथळा रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे.

 1 मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार  शुभारंभ

या यंत्रणेचा शुभारंभ मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी म्हणजे  १ मे रोजी होणार आहे. या यंत्रणेमुळे मंत्रालायचा कारभार पेपरलेस होणार आहे. नागरिकांच्या हजारो तक्रारी, अर्ज, निवेदने यांचा खच मंत्रालयात पडत असतो. या पत्रांचे विलगीकरण करून संबंधित विभागाला पाठविण्याचे आणि त्या पत्रांना उत्तर देण्याचे मोठे जिकिरीचे काम येथील टपाल विभागाकडून पार पाडले जाते. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यासाठी तसेच मंत्रालयाचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय टपाल यंत्रणा (सेंट्रल) रजिस्ट्री युनिट) प्रवेशद्वारावर उभारली जात आहे. या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत 37 विभागांची दररोजची सुमारे 40 हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. या ठिकाणच्या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार असून त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर मिळणार आहे.

टोकन नंबर थेट मोबाइलवर

■ सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये आल्यानंतर ज्या विभागातील खिडकीवर पत्र येईल ते अत्याधुनिक स्कॅनरवर तत्काळ स्कॅन होईल.

■ त्यानंतर या पत्राचा टोकन नंबर तयार होईल, तो पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येईल.
■ त्यानंतर या पत्राची स्कॅन कॉपी संबंधित विभागाकडे जाईल.
■त्यानंतर पत्रावर नेमकी काय कार्यवाही सुरु आहे. हे पत्र देणाच्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाइटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे.