अवकाळी पासवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अखेर कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपुर्वी विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. आता याबाबत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत मोठी घोषणा केली आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार असल्याची माहिती दिली. नुकसान झालेला एकही शेतकरी पीकविम्या पासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिलेत असे देखील सत्तार यांनी सांगितले.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे, असंही यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.