Breaking # शिवरे गावात पाण्यातून २९ जणांना विषबाधा

जळगाव :  पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती चांगली आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रूग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या.

घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेश हून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसापासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत.

तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत‌.

आमदार चिमणराव पाटील यांनीही रूग्णालयात रूग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.