धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण

Badaun Crime News : उत्तर प्रदेशातील बदायूं येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाने पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवासह सासूला अटक केली आहे. दरम्यान, नवरदेवाने केलेल्या खुनाच्या खुलासाने पोलीसही हैराण झाले आहे.

बदायूं जिल्ह्यातील अलापुर गावात राहणाऱ्या नीरजचे २२ जानेवारीला शाहजहांपूरच्या रामनिवास यांच्या मुलीसोबत लग्न झाले. विशेष म्हणजे, नीरज आणि नववधूचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते आणि याच नात्याला अधिकृत रूप देण्यासाठी त्यांचे लग्न लावण्यात आले. मात्र, लग्नानंतर नववधूने नीरजला धक्कादायक सत्य सांगितले, ज्यामुळे हा हिंसक प्रकार घडला.

पोलिसांच्या चौकशीनुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नीरजला सांगितले की, ती अडीच महिन्यांची गर्भवती आहे. हे ऐकताच नीरजला धक्का बसला. त्याने हे घरच्यांना सांगितले, त्यानंतर नातेवाईक आणि गावातील लोकांनी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. या मानसिक तणावामुळे संतापलेल्या नीरजने आपल्या आई कांता यांच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली.

घटनेनंतर नववधूच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या मुलीच्या हत्येसाठी जावई नीरज, सासू कांता, सासरा यादराम, दीर रवी, नणंद अंजू, काका लालाराम आणि दिनेश यांच्यावर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून या कुटुंबीयांनी त्यांची मुलगी संपवली.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नीरज आणि त्याची आई कांता यांना अटक केली आहे, तर अन्य पाच आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नववधूच्या हत्येमुळे संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.