मोठी बातमी! प्रवाशांना मिळाला दिलासा; एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य

पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवसांचा दीर्घ संप केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी त्यावेळी केली होती. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा एसटी कर्मचाऱ्यांना दिला नाही.

मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे दीर्घ कालावधीपर्यंत चाललेला संप अखेरी मिटला अन् एसटी कर्मचारी पुन्हा कामावर आले. त्यानंतर आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी पुन्हा ठप्प होणार की काय? अशी भीती व्यक्त होत असताना दिलासा देणारा निर्णय झाला आहे.

मान्यताप्राप्त एसटी संघटनेकडून विविध मागण्यासाठी सोमवार 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरु केले होते. मागण्या मान्य न झाल्यास 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात काम बंद करण्याचा इशारा दिला होता.

कर्मचारी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक झाली. त्या बैठकीत तोडगा काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांचे उपोषण आणि आंदोलन मागे घेण्यात आले.