पुणे : लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर लोककल्याणाचा विचार कायम ठेवायला हवा आणि त्यासाठी क्षमता वृद्धी संमेलने उपयुक्त ठरतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ यांच्या वतीने देशभरातील आमदारांसाठी दोन दिवसांच्या क्षमता वृद्धी कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे सुमारे २०० हून अधिक आमदार, तसेच विधानसभांचे सभापती, उपसभापती आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.\
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोन्हे आणि ‘एनएलसी भारत’चे संस्थापक-संयोजक डॉ. राहुल कराड उपस्थित होते.
‘विकासाचे राजकारण महत्त्वाचे’ – सुमित्रा महाजन
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, राजकारणात चांगल्या लोकांनी यायलाच हवे आणि आधीपासून असलेल्यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी. यासाठी अशा संमेलने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांनी यावर भर दिला की, राजकीय पक्षांचा विचार केवळ निवडणुकीपुरता न राहता निवडणुकीनंतर सर्व लोकप्रतिनिधींनी देशाच्या विकासासाठी काम करायला हवे.
“गुणात्मक परिवर्तन लोकशाहीसाठी आवश्यक” – नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नसून समाजाचा विकास हे खरे ध्येय असले पाहिजे. लोकशाही मजबूत करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सन्मेलन लोकप्रतिनिधींसाठी उपयुक्त’ – डॉ. राहुल कराड
कार्यक्रमाचे आयोजक डॉ. राहुल कराड यांनी सांगितले की, हे संमेलन लोकप्रतिनिधींमध्ये राष्ट्रहिताची भावना वाढीस लावण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. यामधून विकासाचे राजकारण कसे करावे, प्रभावी धोरणे कशी राबवावीत याचे मार्गदर्शन आमदारांना मिळते.
देशभरातील लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
या संमेलनाला देशभरातील विविध पक्षांचे आमदार, विधानसभांचे सभापती-उपसभापती आणि अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमता वाढीसाठी तसेच विकासाधारित राजकारणासाठी अशा संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.