शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्याचे जागतिक बँकेला साकडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करत असतांनाही शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, निसर्गाचा लहरीपणा! याच अनुषंगाने मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांना केले.

आज ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज एकनाथ शिंदे यांची ’वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे ५००० गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे सहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसर्‍या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.