हृदयद्रावक! लग्नाच्या दिवशीच नववधूचा मृत्यू ; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

तरुण भारत लाईव्ह ।१६ मार्च २०२३। उत्तरप्रदेशमधून एक धक्कायदायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दिवशीच नववधूचा आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच नववधूचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील रुस्तमपूर खादर गावात शेतकरी चंदकिरण हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी कविता (20) हिचा विवाह हसनपूर तहसीलमधील रहिवासी मिंटू सैनी याच्याशी होणार होता. मात्र, लग्नाच्या आधीच कविता तापाने फणफणली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कवितावर गेल्या ५ दिवसांपासून मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. येत्या १५ मार्च रोजी तिचा विवाह होणार होता.

तापामुळे लग्नाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने दोन्ही कुटुंबातील लग्नाचा आनंद दुःखात बदलला. ज्या दिवशी कविताचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही बाब कविताच्या नातेवाईकांना समजताच घरात शोककळा पसरली.