भारताचे मोठे यश ; आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्यूदंडाची शिक्षा रद्द

नवी दिल्ली : कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, ही शिक्षा आता रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते.

आठही जणांना कतारी गुप्तचर यंत्रणा स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती; ज्याची माहिती सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला देण्यात आली. ३० सप्टेंबरला प्रथमच त्यांना कुटुंबातील सदस्यांशी दूरध्वनीद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर जवळपास महिनाभराने ३ ऑक्टोबरला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना आठही भारतीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.

या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त केल्यामुळे हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.