लंडनमध्ये जावून भारताची बदनामी; राहुल गांधींना अनुराग ठाकूर म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्याचं काम करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान केला जात आहे. दिग्गज नेते मोदींचं कौतुक करत आहेत. मात्र परदेशात पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे, असा हल्लाबोल ठाकूर यांनी केला आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची धुलाई-स्वच्छता होत आहे. देशात कुणी विचारत नाही त्यामुळे ते परदेशात जाऊन खोटं बोलत आहेत. कधी ते स्वतः करतात, तर कधी ते त्यांच्या परदेशी मित्रांना बदनामी करायला लावतात. नंतर कोर्ट-संसदेत ते माफी मागतात. अशी बदनामी करण्याआधी राहुल गांधींनी कमीतकमी इटलीच्या पंतप्रधानांचं म्हणणं तरी ऐकायला हवं, असा टोला देखील अनुराग ठाकूर यांनी लगावला. आपल्याला जबरदस्त पंतप्रधान मिळाले आहेत. आपला देश परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणतो. आपत्तीत इतर देशांना मदत करतो असा हा सशक्त भारत आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी
केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये राहुल गांधींनी पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होता. अनेक बड्या नेत्यांच्या फोनमध्येही पेगासस होता. अनेक गुप्तचर अधिकार्यांनी मला फोन करून सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला, तुमचा फोन पाळत ठेवत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन सतत टॅप केले जात आहेत. पेगाससच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारला घेराव घातला आहे. माध्यमे आणि न्यायव्यवस्था नियंत्रित केली जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते.