अरविंद केजरीवाल जेलमधून चालवणार सरकार; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. याविरोधात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे विरोधकांनी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवणार, असा ठाम निर्धार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीच्या जनतेचीही तीच इच्छा आहे. काही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक अडचणी येतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र, इथूनच काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच इतक्या तातडीने ईडी मला अटक करण्यासाठी घरी येईल, असे वाटलेच नाही. मला अटक करण्यासाठी ईडीला दोन ते तीन दिवस लागू शकतील, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.

ईडी अधिकाऱ्यांनी चांगली आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली. अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अटकेत असतानाही चौकशी होईल, याची शाश्वती नाही. कारण ईडीला चौकशी करायची नाही. ईडीला जे करायचे ते करू शकतात. मी पूर्ण तयारी केली आहे. जनतेला मला पाठिंबा आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.