नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना एकनाथ शिंदेचा मोठा दिलासा

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा त्यांनी प्रशासनाला दिल्या.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून या संकटकाळात मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वार्‍यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकर्‍यांना लवकरच भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात येणार असून तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.