इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; भारतीय खेळाडूंना देशात परतण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडी करत आहेत. अशा परिस्थितीत इतर देशातून तेथे पोहोचलेले अधिकारी आणि खेळाडू आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा आणि भारतीय खेळाडूंना लवकर परतण्याची विनंती केली आहे. बीएफएएमई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या भारतीय ब्रिज संघाला भारतीय उच्चायुक्तालयाने लवकरात लवकर लाहोर सोडण्याची विनंती केली आहे.

लाहोरमध्ये सुरू असलेल्या आशियाई आणि मध्य-पूर्व ब्रिज स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारताचे ३२ खेळाडू गेले होते. ही स्पर्धा ५ मे रोजी पाकिस्तानमध्ये सुरू झाली आणि ती १३ मे पर्यंत चालणार होती. भारतीय खेळाडू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात दाखल झाले होते पण आता भारतीय उच्चायुक्तालयाने त्यांना लाहोरहून तात्काळ भारतात परतण्यास सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, इतर सहभागी देशांमध्ये पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन आणि बांगलादेश यांचा समावेश होता.