RTE : ८ मे पर्यंत शाळा प्रवेशासाठी मुदतवाढ, पालकांना दिलासा

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ % जागांवर मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुलांचे मोठ्या संख्येने प्रवेश बाकी असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

जिल्ह्याभरातील २८१ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. ३०८१ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ११२९० अर्ज आले होते. त्यातून २९८३ अर्जांची निवड राज्यस्तरावर सोडत काढून करण्यात आली होती. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी आज २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. याची ऑनलाइन प्रक्रिया १३ तारखे पासून सुरू झाली मात्र पहिल्या दिवसापासूनच पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

पोर्टलची गती धिमी असल्याने प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मुदत संपण्यास एक दिवस बाकी असताना जळगाव जिल्ह्यात केवळ ४४७ मुलांचे प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. राज्य स्तरावर १,०१,८४६ जागांसाठी ९४,७०० अर्जांची निवड झाली होती. त्यापैकी केवळ १२,३३२ प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ८ मे २०२३ पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवून दिली आहे.