फडणवीस म्हणाले, होय आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर…

शिर्डी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलच्या चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्ष देखील अधून मधून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर निशाणा साधत असतो. मात्र आज या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच जाहीररित्या भाष्य केलं आहे. शिर्डी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर त्यांची नजर असल्याचं सांगत त्यामागील कारण देखील सांगितलं आहे.

फडणवीस म्हणाले की, आज एक मजबूत सरकार आहे. काही लोकं दिवसा स्वप्न पाहत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका करतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे कारण आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर केली तर त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम हे दोन्ही उपमुख्यमंत्री करतील असं सणसणीत प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री २४ तास काम करतात. संवेदनशील काम करतात. इर्शाळवाडीत दुर्घटना घडली, जिथे प्रशासन पोहचत नव्हते तिथे पायपीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. त्यामुळे आम्ही तिघे एकत्रित आलोय. शिंदेंच्या कामाची शैली आणि अजित पवार आणि माझं तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिघे एकत्रित आलोय त्या जोडीचा जवाब नाही असंही त्यांनी सांगितले.

शरद पवारांवर निशाणा साधतांनात फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते. काल राष्ट्रीय नेते म्हणाले फडणवीसांनी मी पुन्हा येईन म्हटलं. आता मोदीजी म्हणतायेत. मी ज्यावेळी म्हणालो मी पुन्हा येईन. लोकांनी पुन्हा मला आणले होते. परंतु काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून मी येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे शंका ठेवण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.