धुळे : राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तरी जिलह्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्वरीत काढून घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सूरज जगताप यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये धुळे जिल्ह्यात बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. मृग बहार सन २०२४ मध्ये डाळींब, पेरु, लिंबू, सिताफळ या ४ पिकांसाठी तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा, केळी, द्राक्ष, पपई या ४ फळपिकांसाठी धुळे जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी केले अनिवार्य
दि. ११ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच २५ मे, २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने पुनर्रचित 3 हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये सहभागी होण्याकरीता अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जगताप यांनी कळविले आहे.