---Advertisement---
Kodgaon Dam : गत आठ दिवसांपासून पावसाची हजेरी परिसरात कायम असल्याने मन्याड पाठोपाठ कोदगाव धरणाने देखील बुधवारी शतकी सलामी दिली. यापूर्वीच वलठाण धरण भरले आहे. कोदगाव धरणही ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसाने कमबॅक केल्याने कपाशीसह, मका, कडधान्ये पिकांना बूस्टर मिळाला आहे.
पाटणादेवी डोंगररांगांमधून उगम पावणाऱ्या डोंगरी नदीवर वलठाण व कोदगाव ही धरणे आहेत. १५ दिवासांपूर्वी पाटणादेवीसह कन्नड घाटात दमदार पाऊस झाल्याने वलठाण धरण भरुन वाहिले.
गत चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने कोदगाव धरण देखील ऑसाडून वाहत आहे. मन्याड धरणाने तर यापूर्वीच शंभरी गाठली आहे. अशाप्रकारे डोंगरी नदीवर असणारे हे दोन्ही धरणे भरल्याने कोणत्याहीक्षणी पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने नदीकाठच्या रहिवाश्यांसह गावांनी देखील सर्तकर्ता बाळगणे आवश्यक झाले आहे.
तसेच एरंडोल व धरणगाव तालुक्यासाठी लाईफ लाईन असलेले अंजनी धरणही ९० टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे त्यामुळे ३५० क्यूसेक्सने अंजनी नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.
पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी झाल्यास विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल, त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व गिरणा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी कुलदीप पाटील यांनी दिला आहे. नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.