आधी विनयभंगाचा केला आरोप, नंतर लग्नासाठी लावला तगादा, पुढे काय घडलं?

जळगाव : विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून, संतप्त तरुणीने थेट त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.  पाचोरा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणी तरुणीविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याने तरुणीला अटक करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील तलाठी काॅलनी येथील रहिवाशी निलेश दिलीप बोरसे यांचे विरुद्ध पाचोरा येथील तरुणीने  २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वेळोवेळी तरूणी या तरुणाकडे “माझ्या शी लग्न कर” असा तगादा लावुन धरला होता. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी तरुणीने पुन्हा तरुणास माझ्याशी लग्न कर नाहीतर जिवंत सोडणार नाही. असे म्हणत धारदार चाकूने  हातावर, मानेवर वार करून केले.

या प्रकरणी तरुणाच्या बाहीने दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिसात तरुणीविरोधात गुन्हा आल्याने तरुणीला अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहेत.