वारकर्‍यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; शासकीय महापूजेवेळी…

पंढरपूर : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये येणार्‍या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही वारकर्‍यांना विठ्ठलाचे मुखदर्शन सुरूच असणार आहे. याआधी शासकीय महापूजेच्या चार तासांपूर्वीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखों वारकर्‍यांची मोठी गैरसोय होत असे. त्यामुळे वारकर्‍यांना आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी फार वेळ लागत असे ही गैरसोय टाळण्यासाठी यंदा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानासुद्धा देखील मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री बैठकीत याबाबतची माहिती दिली आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे अडीच वाजता पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो.

या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन होणार आहे. आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळावं यासाठी ३०-३० तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात. दरम्यान व्हीआयपी लोकांच्या दर्शनामुळे वार्‍यांचे प्रचंड हाल होतात. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.