माफी बिनशर्तच हवी !

अग्रलेख

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका केली. मोदी यांची तुलना त्यांनी विषारी सापाशी केली. मोदी विषारी सापासारखे आहेत, ते विषारी नाही, तसे तुम्हाला वाटत नसेल तर त्यांना स्पर्श करून बघा, त्यांना स्पर्श केला तर तुम्ही मरून जाल, असे बिगडे बोल खडगे यांनी काढले. बोलताना जीभ घसरण्याची खडगे आणि काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत मोदींबाबत बोलताना सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सर्व काँग्रेस नेत्यांची जीभ आणि पातळी घसरली आहे. खडगे खरं म्हणजे काँग्रेसमधील अन्य नेत्यांसारखे नाही, प्रगल्भ आणि संयमित राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे, पण काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनाही गांधी घराण्याचे वारे लागले, असे दिसते.ढवळ्यासंग बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी त्यांची स्थिती झाल्यासारखी दिसते आहे.

राजकारणात काय बोलावे, यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला समजते, तो यशस्वी होतो, असे म्हणतात. पण काँग्रेसचे सर्वच नेते गेल्या काही वर्षात अपयशी ठरत आहे, याचे कारण त्यांच्या नको ते बोलण्यात आहे. जिभेला हाड नसल्यासारखे काँग्रेस नेते आपली मुक्ताफळं उधळत असतात. बोलताना आपली जीभ घसरली, याची जाणीव झाल्यानंतर खडगे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.मला तसे म्हणायचे नव्हते, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, असा ठरावीक साच्याचा खुलासा करत जरतरच्या भाषेत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. भाजपा सापासारखा आहे, त्याची विचारधारा विषारी आहे, या विचारधारेचे समर्थन केले तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असे मला म्हणायचे होते. मोदींबाबत मी काहीही बोललो नाही, मी व्यक्तिगत टीका कधीच करत नाही, असे म्हणायलाही ते चुकले नाही.तोंडातून निघालेला शब्द आणि भात्यातून निघालेला बाण कधी परत घेता येत नाही, त्यामुळे नंतर तुम्ही कितीही पश्चातबुद्धीचे प्रदर्शन केले तरी तोपर्यंत तुमचे व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते. त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला, असे नेहमीच म्हटले जाते.

खडगे जे बोलले ती त्यांची भाषा नाही, गांधी घराण्याची भाषा ते बोलले. आपल्या मालकाबद्दलची कृतज्ञतेची भावना खडगे यांनी व्यक्त केली, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. खडगेंचे ते विधान एचएमव्ही मालिकेतील होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असली तरी या अध्यक्षपदासाठी खडगे ही काँग्रेसच्या नेतृत्वाची पहिली पसंती नव्हती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची गांधी घराण्याची इच्छा होती. पण गहलोत यांनी अध्यक्ष होण्याचे नाकारले, त्यामुळे नाईलाजाने गांधी घराण्याला अध्यक्ष म्हणून खडगेंची निवड करावी लागली. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी लाळघोटेपणा करण्याची काँग्रेसच्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते, त्यात आता खडगेंची भर पडली आहे. खरं म्हणजे खडगेंकडून अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. खडगे काँग्रेसचे अध्यक्षच नाही तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेतेपदही त्यांनी सांभाळले आहे. बोलताना खडगे यांची चूक झाली, हे उघड आहे, त्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बिनशर्त माफी मागायला पाहिजे. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही, तर त्याचा मोठेपणा दिसून येतो, याचे भान खडगे यांनी ठेवायला पाहिजे.

काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याने मोदी यांच्याबद्दल अशी भाषा वापरली असती तर लोकांना आश्चर्य वाटले नसते. पण खडगे यांच्या तोंडून अशी भाषा आल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याआधी मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असा केला होता. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांनी मोदींबाबत ‘चौकीदार चोर है’ असे म्हटले होते. मोदी आडनावावरून केलेल्या टीकेमुळे राहुल गांधी यांना नुकतेच आपले लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे. परिणामी खासदार म्हणून दिल्लीच्या ल्युटियन्स झोनमध्ये मिळालेल्या बंगल्यावरही त्यांना पाणी सोडावे लागले. तरी पण राहुल गांधी असो की खडगे यांना शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या अन्य कोणकोणत्या नेत्याने मोदींबाबत कोणकोणते शब्द वापरले याची यादी केली तर ती खूप मोठी होईल. विरोधी पक्षाचे नेते म्हणून खडगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार कोणी नाकारत नाही. मात्र विरोधी पक्षाचे नेते म्हणून आपण काहीही बोलावे, असंसदीय शब्दाचा आणि भाषेचा वापर करावा, हे मान्य करता येत नाही.

टीका करतानाही व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे, मुद्यांवर आधारित टीका केली पाहिजे, तर लोकही अशा विधायक टीकेचे स्वागत करतात. खडगे आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी आतापर्यंत वापरलेली भाषा ही उचलली जीभ लावली टाळूला या प्रकारची आहे. सोनिया गांधींपासून अन्य काँग्रेस नेत्यांनी मोदींबाबत जी भाषा वापरली, त्यावरून त्यांचा मोदींना असलेला व्यक्तिगत विरोध, सूडाची भावना दिसून येते एवढी टीका होत असतानाही मोदी यांनी त्याला उत्तर देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आपण बरे आणि आपले देशविकासाचे काम बरे या भूमिकेतून मोदी यांची वागणूक होती. त्यामुळे ‘हाथी चले बाजार तो कुत्ते भौंके हजार’, या म्हणीचे यानिमित्ताने स्मरण होते. गांधी घराण्याने वा काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी मोदींवर केलेल्या टीकेमुळे काँग्रेसचा फायदा होत असेल तर त्यांनी जरूर अशी टीका करायला हरकत नाही. पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाने मोदींवर खालच्या भाषेत टीका केली, तेव्हा फायदा नाही तर काँग्रेसचे कधीही भरून न निघणारे नुकसानच झाले आहे, हा इतिहास आहे. मोदींवर काँग्रेस नेत्यांनी विशेषत: गांधी घराण्याने केलेल्या टीकेमुळे उलट मोदी यांचाच राजकीय फायदा झाला आहे. कारण मोदींवर केलेली टीका देशातील जनता खपवून घेत नाही.

मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात काय केले, देशाला कसे विकासाच्या मार्गावर नेले, जगात भारताची प्रतिष्ठा कशी उंचावली, हे काँग्रेसच्या नेत्यांना दिसत नसले तरी देशातील लोकांना दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जसे आपले डोळे बंद केले, तसे देशातील जनतेने आपले डोळे बंद केले नाही. आपल्या ६० वर्षांच्या शासनकाळात काँग्रेसने विशेषत: नेहरू-गांधी घराण्याने देशाचा कसा बट्ट्याबोळ केला, हे कोणी सांगण्याची गरज नाही, देशातील जनतेला ते दिसते आहे. त्यामुळे गांधी घराण्यातील नेते वा अन्य काँग्रेस नेते जेव्हा मोदींवर टीका करतात, तेव्हा लोकांचे मनोरंजन होते, काँग्रेसच्या नेत्यांचा मूर्खपणा पाहून त्यांची कीव कराविशी वाटते.’ त्यामुळे आतातरी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांच्यावर टीका करू नये. टीका करायचीच असेल तर पुरेसा अभ्यास करून तर्कशुद्ध टीका करावी. जेणेकरून देशातील लोकांना ती खरी वाटेल. भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसचे आतापर्यंत तेवढे नुकसान केले नाही, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या हाताने केले आहे.