खान्देशची मुलुखमैदानी तोफ थंडावली! माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं निधन

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : अख्या महाराष्ट्रात मुलूख मैदान तोफ म्हणून प्रचलित असलेल्या अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे निधन झाले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (23 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात अंत्यसंस्कार (Funeral) केले जाणार आहेत.

गुलाबराव पाटील १९७८ ला पहिल्यांदा ‘पुलोद’ सरकारमध्ये निवडून आले. नंतर अडीच वर्षांत सरकार बरखास्त झाले. पुन्हा १९८०मध्ये निवडून आले. १९८५ मध्ये अमृतराव पाटील यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर १९९० ते ९५ दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे ते आमदार होते. त्यांच्यावर सानेगुरुजींच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.

संविधानावरील वकिलांच्या चर्चासत्रात दहावी शिकलेले एकमेव गुलाबराव पाटील सहभागी झाले होते. त्यांनी ‘साथी संदेश’ वृत्तपत्रही काढले होते. त्यांची निर्भीड पत्रकारिता खूप गाजली होती. त्यांना साथी गुलाबराव म्हणूनदेखील ओळखत होते. त्यांच्या वक्तृत्वाचा इतका प्रभाव होता, की जाहीर सभेत मध्यंतर घेऊन पुन्हा सभा घेणारे आचार्य प्र. के. अत्रे यांच्यानंतर ते एकमेव होते. अमळनेरात शिक्षणासाठी चांगली शाळा असावी म्हणून त्यांनी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून सानेगुरुजींच्या नावाने शाळा सुरू केल्या. एखाद्याच्या गोटात जाऊन त्याची माहिती काढून विधानसभेत मांडत असत. शरद पवार, शंकरराव चव्हाण, भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर, एकनाथ खडसे आदींसह अनेकांवर त्यांनी बेधडक टीका केली होती. विरोधकांवर सभागृहात जितके आक्रमकपणे ते बोलत होते, तितकेच त्यांचे सभागृहाबाहेर मैत्रीचे संबंध होते.