Girish Mahajan : उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बरसले, म्हणाले “निकाल येण्याआधीच…”

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका केल्याने मंत्री गिरीश महाजन चांगलेच बरसले. “निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समोर अंधार दिसत आहे. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन ? 

निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊतांचा हा स्वभाव झालेला आहे. ईडीच्या बाबतीत तेच, न्यायालयाच्या बाबतीत तेच, निवडणूक आयोगाच्या बाबतीतही तेच मत आहे. प्रत्येक वेळेला निकाल आमच्या बाजूने द्या मग न्यायालय बरोबर काम करताय, नाही दिला तर आमच्या विरोधात काम करतंय, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्याला कुणीही महत्व देत नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन बोलत होते.