त्यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे ; गिरीश महाजनांची राऊतांवर टीका

मुंबई : भाजपा नेते आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत बोचरी टीका केली होती. तर, आमच्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा डंपर पलटी केल्यांचही म्हटलं होतं. त्यानंतर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही प्रतिउत्तर देत फडणवीसांवर बोचरी टीका केली. आता, संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दात पलटवार केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊतांबद्दल काय बोलायचं मी. तुमच्या बाजुला कुणीही राहिलेलं नाही. तुमच्याकडे ५० पंचावन्न पैकी ५ जण देखील राहणार नाही. तरीही तुम्ही मस्ती जात नाही, तुमची रग अजून जात नाही. आपल्या काय चुका झाल्या, यावर आपण परिक्षण, निरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि इकडे गेले, तिकडे, उकिरड्यावरची घाण गेली. मला वाटतं आता त्यांच्याकडे कुणीच राहिलं नाही. त्यामुळे, बिचाऱ्यांचा तोलच गेलेला आहे. त्यांचा बॅलेन्स गेलेला आहे, म्हणून सकाळपासून वेडवाकडं बोलायचं, घाणेरडं बोलायचं. एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे, अशा शब्दात महाजन यांनी जोरादार हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात कोपऱ्यात जाऊन फोनवर संभाषण केलं. त्यावरुनही संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यासंदर्भानेही, महाजन म्हणाले की, एखादा महत्वाचा फोन आला तर स्पीकर लाऊन बोलायचं का?, त्या राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?, या माणसाचा खरंच इलाज केला पाहिजे, त्यांच्या डोक्याचा इलाजच केला पाहिजे. तुम्हाला जर उद्धव ठाकरेंचा फोन आला तर तुम्ही माईक लावून बोलणार आहात का, असा सवालही महाजनांनी केला.

काय म्हणाले होते संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीसछाप सरकारने केला. पण, काही फायदा झाला नाही, ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये ते बसले आहेत. जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे. या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही, तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत, हे मी फडणवीस यांना सांगू इच्छितो अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.