जळगाव : जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ३१ मार्चपर्यंत कराची थकबाकी भरावी; अन्यथा थकबाकीदार सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ३१ मार्चपर्यंत घरपट्टी, नळपट्टी वा अन्य करांची थकबाकी भरलेली नाही, त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. कर भरण्याची पावती मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कर रकमांचा भरणा न केल्यास संबंधित सरपंच आणि उपसरपंच वा ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरू शकतात.
हेही वाचा : दोघांत तिसरा, संतापलेल्या नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं
सरपंच, उपसरपंच वा ग्राम पंचायत सदस्यांनी कर भरण्याच्या अंतिम मुदतीची माहिती घ्यावी, तसेच ज्या सदस्यांना ग्रामपंचायत कराची पावती मिळाली नसेल, त्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधून थकबाकीची पावती मिळवावी आणि मुदतीत भरणा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वेळेत कराचा भरणा न केल्यास थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत सदस्यांना दिला आहे.