मुसळधार पावसाने खान्देशातील ‘हे’ शहर झाले जलमय; कामकाज ठप्प

जगदिश जायसवाल
शहादा : शहाद्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरल्याने संपूर्ण न्यायालय परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. सर्व न्यायालये व न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.

येथील डोंगरगाव रोडवर न्यायालय परिसर खूप मोठा असून, या ठिकाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे तीन, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिशांचे दोन तर एक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अशी सहा न्यायलये आहेत. ही सर्व न्यायलये एकाच परिसरात आहेत. यात दोन ईमारती नव्याने बांधल्या गेल्या असून उर्वरित न्यायालये ब्रिटिशकालिन आहे. तसेच सर्व सहा न्यायाधीशांची निवासस्थानेही याच परिसरात आहेत. हा संपर्ण परिसर भक्कम भिंतींनी वेढलेला आहे.

न्यायालयाच्या समोर डोंगरगाव तलावातून आलेली पाटचारी वाहते. मोठा पाऊस आला तर या पाटचारीचे पाणी दरवर्षी न्यायालयात शिरते आणि कामकाज ठप्प होते. यंदाही या पाटचारिचे पाणी मोठ्या प्रमाणात न्यायलय परिसरात शिरल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या परिसरात सुमारे गुडघाभर पाणी साचले आहे. न्यायालयाची जुनी ईमारत खलोगट भागात असल्याने या न्यायालयाचे कामकाज चालत असलेल्या सर्व ईमारतीमध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. पाटचारी शिवाय पाण्याचा निचरा नसल्यामुळे पाणी न्यायालयाच्या आवारात साचून आहे. पाण्याचा योग्य निचरा नसल्याने तीन ते चार दिवस हे पाणी ईमारत व आवारात साचून राहतेपरिणामी तो पर्यंत न्यायालयिन कामकाज ठप्प राहते. अथवा तश्याच परिस्थितीत कामकाज चालवणे भाग पडते. कसेतरी पाण्याचा निचरा केला तरीही न्यायालयपरिसर व सर्व इमारतीमध्ये कित्येक दिवस मोठ्या प्रमाणात चिखल व घाण, कचरा साचलेला राहत असल्याने आरोग्यही धोक्यात येते. सुदैवाने आज न्यालयाला मोहरमची सुटी असल्याने न्यालयाचे सुनावणीचे काम बंद होते. मात्र दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. न्यायाधिशांच्या दोन मजली ईमारतिंच्या तळ मजल्यात गुडघाभर तर सिंगल मजली जुन्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना समस्येचा सामना करावा लागत आहे.

पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरून गुडघाभर पाणी साचण्याची ही समस्या काही नवीन नसून, दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर न्यायालयाच्या आवारात पाणी शिरून कामकाज ठप्प होत राहत आलेले आहे. यासाठी बार असोसिएशन च्या माध्यमाने जनहितयाचीकाही दाखल करण्यात आलेली होती. मात्र पाटचारीतील सिमेंटचे पाईप काढल्याशिवाय या समस्येवर ठोस उपाय योजना अध्यापही करण्यात आलेली नाही. दरवर्षी ही समस्या उद्भवतच असते. या समस्येकडे आतापर्यंत कधीच गांभीर्याने पाहिले गेलेले नाही.

न्यायालय परिसरातील सर्व जुन्या इमारती पाडून तेथे न्यायालयाच्या नवीन इमारती बांधण्याचे काम मंजूर झालेले आहे. मात्र विविध कारणांनी हे काम अद्याप रखडलेलेच आहे. जोपर्यंत नवीन इमारती बांधल्या जात नाही तोपर्यंत तरी न्यायालयाच्या परिसरात पाणी शिरणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु नवीन इमारत बांधल्या गेल्या तरीही या पाटचारीचे पाणी नव्या इमारतींमध्येही शिरण्याची दाट शक्यता आहेच. परिणामी सदर पाटचारिंचा निचरा कायमस्वरुपी बदलणे किंवा सर्व पाटचारी बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.