हवामान खात्याचा अंदाज चुकला! राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार

नागपूर : राज्यात गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान खात्यानेदेखील ऑगस्ट महिन्यात पाऊस उसंत घेणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो खोटा ठरवत आज बुधवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. बुधवार आणि गुरुवारी जळगाव, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर बुधवारपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरालाही बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट आहे. या दोन दिवशी पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथेही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.