हिंदुत्व : स्वातंत्र्योत्तर कालखंड !

इतस्तत:

– डॉ. विवेक राजे

इंग्रजी जोखडातून मुक्त होण्याआधी हिंदुत्व विचारांना राजकीय आणि सामाजिक पाठींबा नव्हता. कारण, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंदू-मुस्लिमांनी एकत्र असायला हवं, ही राजकीय विचारसरणी होती. हिंदू संस्कृतीवर होणारे हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमण आहे, हे हिंदू समाजाच्या लक्षात यायला बराच वेळ लागला. दृश्य स्वरूपात मुस्लिम समाजाने वेगळ्या व्यवस्थेची मागणी जरी १९३० नंतर करायला सुरुवात केली असली, तरी ही दुहीची बीजे ब-याच आधीच्या काळात रोवली गेली होती. या देशावर आपण राज्य करीत होतो. आपण मुसलमान जेते होतो, ही मुस्लिम समाजाची मानसिक धारणा बनवली जात होती. तीच धारणा आजतागायत कायम आहे. आपलाच समाज मोठा लढवय्या आहे, इतर आणि विशेषतः हिंदू हे डरपोक, भित्रे असतात हीदेखील या समाजाची धारणा आहे. या धारणेला स्वातंत्र्यानंतरच्या काळात खतपाणी घातले गेले.

स्वातंत्र्योत्तर भारतात अनेक धोरणात्मक निर्णय यासाठीच घेण्यात आले. बहुसंख्य हिंदूंना कायमच दबावाखाली ठेवणं आणि मुस्लिम समाजधार्जिणी धोरणं आखणं, या देशात जास्तीत जास्त काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसी सरकारांनी केले. लॉर्ड माऊंट बॅटन यांच्या देशाची फाळणी करण्याच्या प्रस्तावाचे मुस्लिम लीगने सहर्ष स्वागत केले शेवटी गांधीजींनी फाळणीच्या प्रस्तावाला केवळ मान्यताच नव्हे तर त्यापुढे जात त्यांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचा अतिरेकी आग्रहदेखील धरला. फाळणीविरोधी निदर्शने फक्त हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनीच केली. पण स्वातंत्र्य मिळणार या कल्पनेनेच भारावलेल्या काँग्रेसने त्याकडे लक्षच दिले नाही. देशाची फाळणी झाली. त्या पाठोपाठ आजच्या पाकिस्तानात त्या प्रदेशातून हिंदूंना हुसकावून देण्यासाठी सुनियोजित दंगली घडवून आणल्या गेल्या. देशाच्या इतर भागातही दंगली झाल्या. मुस्लिम समाज या सर्व गोष्टींसाठी तयार होता. त्या समाजाची तशी तयारी करवून घेतली गेली होती. ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’च्या रूपाने या तयारीला आजमावलेदेखील गेले होते. पण गांधी, नेहरू आणि काँग्रेस या सर्व घटनांकडे जणू बघतच नव्हते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटनांच्या हाती ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याच्या प्रयत्नांशिवाय फारसं काही नव्हतंच. ते आपल्या ताकदीपेक्षा जास्त चांगल्यारीतीने कर्तव्य पार पाडत होते. त्यात गांधी हत्या घडली आणि सर्व बाजूंनी हिंदुत्व विचारांची गळचेपी सुरू झाली. आपण हिंदू आहोत, हे सांगण्याची चोरी झाली. देशभरात धरपकड सुरू झाली. हिंदुत्ववादी असणं म्हणजे जणू अपराध झाला. येथील संवेदनशील समाजाला हे समजत होतं, पण काँग्रेसी झुंडशाहीपुढे ते गप्प बसणं श्रेयस्कर मानत होते. qहदू एकतेसाठी कटिबद्ध असणा-या संघावर बंदी घातली गेली. त्या विरोधात स. का. पाटील आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी माणसांना आवाज उठवावा लागला. कालांतराने ती बंदी उठवली गेली. पण गांधी हत्येने हिंदुत्व विचारांचे प्रचंड मोठे नुकसानच झाले. आपल्या विचारांना देशाच्या राजकीय व्यासपीठावर मांडणे आवश्यक आहे, हे जाणून संघाने प्रखर हिंदुत्ववादी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय जनसंघ’ ही नवी राजकीय शाखा अस्तित्वात आणली. दीनदयाल उपाध्याय, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, बच्छराज व्यास, लालकृष्ण अडवाणी, बलराज मधोक यांच्यासारखे प्रचारक जनसंघाला दिले.

हिंदू महासभेचा प्रभाव ओसरू लागला होता. त्यावेळी हिंदुत्व विचारांना जनसंघाच्या रूपाने राजकीय कोंदण मिळाले. संघ, निवडणुका व राजकीय मुद्दे दूर ठेवून फक्त सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून हिंदू संघटन करीत हिंदुत्व विचारांचा प्रसार करीत होता तर राजकीय आयामात हिंदुत्व विचारांचे संरक्षण व संवर्धन करताना जनसंघ दिसत होता १९४८ साली घालण्यात आलेल्या पहिल्या संघबंदीनंतर केलेली ही विभागणी आजही कायम आहे. १९४९ ते १९७५ या कालावधीत या देशाला तीन युद्धं लढावी लागली, पण याच काळात फक्त हिंदुत्व विचारांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या, येथील व्यवस्थेच्यादेखील विरोधात जाणाèया साम्यवाद्यांचे पितळ या निमित्ताने उघड झाले. या काळात हिंदुत्ववादी विचारांनी देशात नवचैतन्य निर्माण करण्यात मोलाची कामगिरी बजावली. पण राजकीय व सामाजिक आघाडीवर हिंदुत्ववादी विचारांना पुरेसा पाठींबा दिसत नव्हता. राजकीयदृष्ट्या हिंदू विचारांचा दुस्वास चालूच राहिला. मात्र, याच काळात विवेकानंद शिलास्मारकासारखे काही महत्त्वपूर्ण प्रकल्प फक्त जनतेच्या मदतीवर पूर्ण झाले. याच काळात विश्व हिंदू परिषद ही स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली. हिंदुत्व विचारांना, नेतृत्वाला तसेच संघालादेखील सामाजिक व राजकीय स्वीकृती आणि आदर मिळू लागला तो आणिबाणीच्या काळात. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ पर्यंत तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लागू केली.

या काळात सर्वच विरोधकांना त्यांनी तुरुंगात डांबले. वृत्तपत्र व इतर सर्वच माध्यमांवर सेन्सॉरशिप लावण्यात आली. जवळजवळ सर्व राजकीय नेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते तुरुंगात डांबले गेले. याला विरोध करण्यासाठी आवश्यक असलेले संघटन फक्त रा. स्व. संघाकडे होते. या काळात हिंदुत्ववादी विचारांचा आणि लोकांचा राजकीय व सामाजिक वनवास संपून सर्व स्तरांवर त्यांना बèयाच प्रमाणात स्वीकृती मिळू लागली. शाहबानो प्रकरणी केंद्र सरकारने १९८६ साली पुन्हा एकदा मुस्लिम तुष्टीकरणाचा पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालयाने पोटगी द्यावी लागेल, असा निर्णय दिल्यानंतर तो निर्णय रद्दबादल करणारे एक विधेयक पारित केले. तेव्हाच्या राजीव गांधी सरकारला असलेल्या राक्षसी बहुमतामुळे ते पारितही झाले. यात मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न अगदी स्पष्टपणे समोर आला. कारण, सय्यद शहाबुद्दीनसारख्या मुस्लिम नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पोटगी देण्याच्या निर्णयावर भारतभर निदर्शने करण्याची धमकी दिली होती. देशभरात या तुष्टीकरण नीतीमुळे हिंदू समाजात संतापाची लाट निर्माण झाली. त्यामुळे हादरलेल्या राजीव गांधींच्या सरकारने हिंदूंना खूश करण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त वास्तूत १९४९ मध्ये सापडलेल्या रामाच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी देत, त्या विभागाचे कुलूप उघडले.

जागृतीची एक प्रचंड मोठी लाट हिंदू समाजात उठली. उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणा-या कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश दिले. अनेक आंदोलकांना जीव गमवावा लागला. रामजन्मभूमीवरील वादग्रस्त ढाचा हिंदू आंदोलकांनी उत्स्फूर्तपणे ६ डिसेंबर १९९२ रोजी जमीनदोस्त केला. हिंदू अस्मिता जागृत झाली. हिंदू समाजाला योग्य राजकीय नेतृत्व आवश्यक होते, ते २०१४ च्या निवडणुकीत हिंदू समाजानेच निवडून आणले. आज २०२३ मध्ये अयोध्येत राममंदिर उभे राहताना दिसते. ३७० कलम रद्द होऊन काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सार्वभौम भारताने जाहीर केले आणि जगाने ते स्वीकारलेदेखील! भारतीय लष्कर कोणतेही आव्हान स्वीकारण्यासाठी तयार दिसते. काशी विश्वनाथ कॉरिडोर, महांकाल प्रकल्प तयार झालेले दिसतात. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाते आहे. जगात कोठेही हिंदू माणसाला, मान ताठ करून आपण हिंदू आहोत हे सांगण्यास अभिमान वाटावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण हीच वेळ अधिक सावध आणि अधिक महत्त्वाकांक्षी होण्याची आहे. मथुरा, काशी तसेच अनेक देवस्थाने मुक्त होणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी आजही मशिदी व मजारी निर्माण होत आहेत. अजून बरीच मजल हिंदुत्व विचारांना मारायची आहे. तेव्हा हे हिंदू समाजपुरुषा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।