मुंबई-हावडा मेलचा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले

झारखंड : हावडा –  सीएसएमटी एक्सप्रेस (ट्रेन नंबर १२८१०) मुंबईकडे जात असतांना टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रेनचे पाच डबे रुळावरुन घसरले आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचें वृत्त असून अपघातस्थळी मदतकार्याला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे.

हावडा सीएसएमटी एक्सप्रेस ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार प्रदान केले जात आहेत. तसेच काही रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

ही मेल हावड्यावरून मुंबईला जात होती. रात्री ही मेल राजखरसावां जंक्शनमधून निघाली. सकाळी पावणेचारच्या सुमारास रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी सकाळी सव्वाचार वाजता एआरएमई रेल्वे घटनास्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी चक्रधरपूर रेल्वे रुग्णालय व खरसावनच्या शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.

प्रवाशांसाठी हेल्पलाईन

या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. टाटानगर : 06572290324, चक्रधरपूर : 06587 238072, हावडा : 9433357920 व रांची : 0651-27-87115 हे हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहे.