‘या’ प्रकल्पाला पहिल्याच पावसात गळती; विभागाचे अधिकारी तळ ठोकून; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तळोदा (मनोज माळी) : तालुक्यातील इच्छागव्हाण येथे लघु पाटबंधारे योजनेतून बांधण्यात आलेल्या प्रकल्पास पहिल्याच पावसात गळती लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धरण फुटण्याची भीती निर्माण झाल्याने, प्रकल्पातील पाण्याचा विमोचकाद्वारे विसर्ग करण्यात येत आहे. धरणात मोठ्या प्रमाणावर साठलेल्या पाण्याचा जलद गतीने विसर्ग व्हावा, यासाठी जेसीबीच्या साह्याने इतरत्र ठिकाणी पाटचारी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून असून, धरण क्षेत्रातील प्रभावित गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी इच्छागव्हाण गावाशेजारी नंदुरबार मध्यम प्रकल्प अंतर्गत लघुपाट बंधारे योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला आहे. यावर्षी या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत प्रथमतः सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प भरला आहे. या प्रकल्पाला अचानकपणे २० जुलै रोजी गळती लागल्याचे समोर आल्याने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता, उप अभियंता यांनी भेट देऊन पाहणी करून हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने २१ जुलै रोजी धरण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तातडीने गावांना सतर्कतेच इशाऱ्याची नोटीस बजावण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले धरण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणीसाठ्याचा विसर्ग करण्यात येत असून धरण क्षेत्राच्या पूर्वेस पाण्याच्या विसर्ग करण्यासाठी तातडीने जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात पाटचारी खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत.

या प्रकल्पातील पाणीसाठ्याच्या विमोचकाद्वारे पाण्याच्या अखंड विसर्ग सुरू असून इतरत्र ठिकाणी पाठचारी करून विसर्ग करण्यात येणार असून या परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठा सुरूच असल्याने प्रकल्पा अंतर्गत असलेल्या गावांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न कायम असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या धरण क्षेत्र पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होत आहे.

हा प्रकल्प पूर्ण होऊन पहिल्याच वर्षी प्रकल्पात पाणीसाठा करण्यात येत होता गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पर्वत रांगानमध्ये व परिसरात गेल्या काही दिवसान मुसळधार संततधार पाऊस होत असल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे अचानकपणे प्रकल्पाला गळती होत असल्याचे समोर आल्याने प्रकल्प फुटण्याच्या भीतीने पाणीसाठ्याच्या विसर्ग करण्यात येत आहे या प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या प्रकल्पाला गळती लागल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.

प्रकल्पाला २० जुलै रोजी गळती लागल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर तातडीने नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उपकार्यकारी अभियंता के.बी. पावरा यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला या प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता वरतावत या प्रकल्प क्षेत्रातील इच्छागवान सोळा पाडा अंमल पाडा मोदल पाडा राजपूत गुजरात राज्य आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची विनंती केली मात्र प्रकल्पाला गळती लागल्याचा कुठेही उल्लेख न केल्याने या विभागातील वरिष्ठ अभियंत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.