दुबई : सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया आज, रविवारी न्यूझीलंड संघाचा सामना करणार आहे. यात टीम इंडिया फिरकी गोलंदाजी अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच आतापर्यंत वगळण्यात आलेल्या खेळाडूंना संधी मिळू शकते, अशी वर्तण्यात येत आहे. विशेषतः विराट कोहलीसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.
बांगलादेशचे फिरकीपटू मेहदी हसन मिराज आणि रिशाद हुसेन यांच्यातिरुद्ध भारताच्या स्टार फलंदाजांनी जोखीम न घेण्याची रणनीती अवलंबली. त्यांनी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदविरुद्धही हीच रणनीती अवलंबली आणि तिन्ही गोलंदाज खूपच किफायतशीर ठरले.
आता भारतीय फलंदाजांसमोर मिचेल सेंटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांचे आव्हान असेल. जी या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वांत कठीण परीक्षा असेल दोन्ही किवी फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि दुबईच्या खेळपट्टीतर ते अधिक प्रभावी ठरू शकतात.
फॉर्मात असलेला शुभमन गिल, पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणारा विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांना न्यूझीलंडच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी कामगिरी करावी लागेल. स्पर्धेपूर्वी संघात पाच फिरकीपटू निवडल्याबद्दल भारतावर टीका होत होती; परंतु येथे फिरकीपटूंच्या वर्चस्वामुळे भारताला बळकटी मिळाली आहे.
विराट कोहलीसाठी हा सामना विशेष
दरम्यान, आज, रविवारी होणारा सामना विराट कोहलीचा ३००वा एकदिवसीय असणार आहे. कोहलीच्या चाहत्यांची उत्साह शिगेला पोहचली आहे. तसेच आज, रविवार असल्याने चांगल्या सामन्यासाठी गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी चिंताजनक आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टीम इंडिया आणि न्यूझीलंड फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकला होता. त्यामुळे आज टीम इंडियाचा हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करते का ? हे पाहावं लागणार आहे.