अंतराळात भारत उभारणार स्वतःचं स्पेस स्टेशन; काय आहे इस्रोची योजना?

नवी दिल्ली : चांद्रयान-3 व आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो लवकरच अंतराळात भारताचं वेगळं स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम हाती घेणार आहे. सध्या अंतराळात एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ज्याला 15 देशांनी मिळून बनवलं होतं. त्यानंतर चीनने स्वतःचं वेगळं स्पेस स्टेशन प्रस्थापित केलं. इस्रोची मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताचं स्पेस स्टेशन हे तिसरं असणार आहे.

स्पेस स्टेशन ही अंतराळात तयार करण्यात आलेली एक प्रयोगशाळा म्हणता येईल. याठिकाणी अंतराळवीर सहा-सहा महिने राहून विविध प्रकारचे संशोधन करतात. सध्या अवकाशात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) एका वेळी कमीत कमी सात अंतराळवीर तरी असतातच. NASA, JAXA, ESA, CSA आणि ROSCOSMOS अशा विविध अंतराळ संस्थांनी मिळून ISS तयार केलं होतं.

इस्रो जे स्पेस स्टेशन बनवेल, ते सुमारे 20 टन वजनाचं असणार आहे. यामध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या LEO कक्षेमध्ये हे स्पेस स्टेशन प्रस्थापित केलं जाईल. इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवान यांनी 2019 साली या स्पेस स्टेशनची घोषणा केली होती. गगनयान मोहीम झाल्यानंतर 2030 सालापर्यंत हे स्पेस स्टेशन उभारण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

भारताचं स्पेस स्टेशन तयार होण्यापूर्वीच अमेरिकेने यासाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याचं कबूल केलं आहे. यासाठी NASA आणि ISRO या संस्थांमध्ये करार देखील झाला आहे. सर्व काही सुरळीतपणे पार पडल्यास, 2024 साली दोन भारतीय अंतराळवीर हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर देखील जाऊ शकतात.