जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्ट शब्दात सुनावले; वाचा काय म्हणाले…

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध अद्यापही ताणले गेल्याचे पाहायला मिळत आहेत. लंडन येथील एका कार्यक्रमात बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि कॅनडा वादावर भाष्य केले. तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत, असे जयशंकर यांनी सांगितले आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत भारतावर होत असलेल्या आरोपांवर जयशंकर यांनी कॅनडाकडून पुन्हा एकदा पुराव्याची मागणी केली आहे. भारत सरकार निज्जरच्या हत्येची चौकशी करण्याची गरज नाकारत नाही. मात्र, कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय एजंटांची भूमिका असल्याच्या आरोप केला असून, या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत. भारतावर आरोप करताना त्याबाबतचे पुरावेही द्यावेत. आम्ही तपासाला नकार देत नाहीत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

हिंसक मार्गांसह अलिप्ततावादाचे समर्थन करणाऱ्या आणि टोकाच्या राजकीय मतांना कॅनडाच्या राजकारणात स्थान दिले जात आहे. असे लोक कॅनडाच्या राजकारणात आहेत. त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते काही जबाबदारीसह येते. अशा स्वातंत्र्याचा गैरवापर आणि राजकीय हेतूने दुरुपयोग केला जात असेल, तर ते सहन करणे अत्यंत चुकीचे ठरेल. तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण असेल तर कृपया पुरावे आमच्यासोबत शेअर करा. आम्ही तपास करण्यास नकार देत नाही. मात्र, त्यांनी तसे काहीही केलेले नाही, असे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले.