---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : केळीच्या आगारातील रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यांसह जामनेर, चोपडा तथा शिरपूर, सोलापूर व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यांतही केळीमालाची सार्वत्रिक मागणी वाढली असताना केळीच्या दरात महिनाभरात सुमारे १ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
महिनाभरापूर्वी कमाल २७०० ते सरासरी २००० रुपये क्विंटलप्रमाणे मिळत असलेल्या बाजारभावात घसरण झाल्याने आता कमाल भाव प्रतिक्विंटल १७०० रुपये, तर किमान बाजारभाव १४०० पर्यंत घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
उत्तर व दक्षिण भारतातील श्रावण महिना संपुष्टात येऊन आतापर्यंत दोन श्रावण सोमवारांची केळी लोडिंग आटोपली असल्याने तथा गुणात्मक दर्जाच्या केळीमालाअभावी आखाती राष्ट्रांत होणारी निर्यातही घटली आहे.
याचबरोबर उत्तर भारतात मुसळधार पाऊस, वाहतुकीच्या मार्गातील नद्यांना आलेल्या महापुरांमुळे केळी वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने केळीमालाच्या मागणीत अंशतः घट आली असली तरी देशांतर्गत केळीमालाची वाढती मागणी असतानाही केळी बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र आहे.