Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच केलं वाळू माफियांना आवाहन; म्हणाले…

जळगाव :  जिल्हातील वाळूच्या अवैध वाहतूकीचा प्रश्‍न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरत असताना जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकरी  आयुष प्रसाद यांनी याविरोधात ऍक्शन प्लान तयार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. वाळूची अवैध वाहतुक करणार्‍यांनी हा धंदा सोडून वैध मार्गाने व्यवसाय करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वाळूची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी यापुर्वी अपर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यात चर्चा झाली आहे. या वाळूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण कसे राखता येईल याविषयी मायक्रो प्लाननुसार काही दिवसात ऍक्शन देखील करण्यात येईल. वाळूचे अवैध वाहतुक करणार्‍यांनी हा धंदा बंद करावा. त्यांना दुसर्‍या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास त्यांनी या व्यवसायिकांना दिला आहे. अन्यथा वाळूची अवैध वाहतुक करणार्‍यांवर एमपीएडी लावून वाहन जप्ती व गुन्हा दाखल सारखी कठोर कारवाई करण्यता येईल असा  इशारा देखील त्यांनी दिला आहे.

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज  सोमवार २४ जुलै रोजी पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टीचा घेतला आढावा
जिल्हधिकारी श्री.प्रसाद यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागाच्या अधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. जळगाव जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू , पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. गणेशोत्सव साजरा करतांना एक गाव-एक गणपती ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच येणारे सण-उत्सवाच्या काळात शांतता व सलोखा कायम असण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ई-गव्हर्नसद्वारे कारभार करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान पद्धतीने चालवण्यात येईल. भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नव मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी यावेळी केले.

पहा व्हिडिओ
https://youtu.be/jChFPicRhNE