जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन, वाचा काय म्हणाले…

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा करत दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यावे, असे भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड केले आहे.

जितेंद्र आव्हाड शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही त्या दोन-चार जणांमुळे बाहेर पडलो असं अजित पवार गट सांगत आहे. मला सत्तेच राजकारण करायचे नाही, पैशाच राजकारण करायचे नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर गेल्याने पक्ष खूप वाढणार आहे, तर मी शपथ घेतो की मी तर बाहेर जाईनच जयंत पाटील यांनाही घेऊन जाईन.”

याचबरोबर, पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवार गट जयंत पाटील आणि आमच्यावर टीका करत आहे की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरले आहे. या बडव्यांना नाही राहायचं. आम्हाला काहीही नको. आम्ही सगळं सोडून जातो. तुम्ही फक्त परत या, पण साहेबांना त्रास देऊ नका.” दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या भावनिक आवाहानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.