मी हरेन किंवा जिंकेन माहिती नाही मात्र.., कपिल सिब्बल यांचं भावनिक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा सुनावणी खटला हा देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज एक भावनिक वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे खटल्यावर युक्तिवाद सुरु आहेत. कोर्टाने सर्वात आधी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करायला सांगितलं.

सिब्बल यांनी सलग तीन दिवस युक्तिवाद केला. त्यानंतर आज ठाकरे गटाचेच वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली. आज गुरुवारी झालेल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार तसेच बहुमत चाचणीतील आकडेवारीवरून जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल यांनी ही भावनिक टिप्पणी केली.

काय म्हटलंय कपिल सिब्बल?
युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल म्हणाले, मी इथे या खटल्यासाठी उभा आहे. हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. मात्र घटनात्मक सार्वभौमत्त्व हे आमच्या हृदयाशी अगदी जवळचे आहे. त्याच्या संरक्षणासाठी मी इथे आहे. घटनात्मक प्रक्रियेचा बचाव होईल, याची सुनिश्चितता करण्यासाठी मी इथे आहे. मात्र कोर्टाने सदर घटनाक्रमाला परवानगी दिली तर १९५० पासून आपण टिकवून ठेवलेल्या लोकशाहीचा अंत होईल. घटनात्मक प्रक्रियेत अशा प्रकारे हस्तक्षेप झाला तर लोकशाही आणखी कोणत्या मार्गाला पोहोचेल हे सांगता येत नाही.